शनिवार, १८ जानेवारी, २०१४

आता रेशीम किडेच देणार रंगीत कोष

आता रेशीम किडेच देणार रंगीत कोष


पुणे आणि म्हैसूर येथील संशोधकांचे संशोधन

 सुमारे पाच हजार वर्षापूर्वी पासून रेशीम किड्यांची पैदास, त्यातून  पांढऱ्या चमकदार रंगाचे रेशीम धागे आणि त्यापासून रेशमी वस्त्रांची निर्मिती केली जाते. त्यावर रंग देण्यासाठी कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये  अनेक विषारी धातूंचा समावेश होतो. तो टाळण्यासाठी भारतीय संशोधकांनी रेशीम किड्यांना रंगवलेल्या पाने खाऊ घालून, त्यापासून नैसर्गिकरीत्या रंगीत रेशीम मिळवण्याची पद्धती विकसित केली आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल एसीएस सस्टेनेबल केमिस्ट्री ऍण्ड इंजिनियरींग मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
पुणे येथील राष्ट्रिय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधक अनुया निसळ, हसन मोहम्मद,सुयना पन्नेरी, सयाम सेन गुप्ता, आशिष लेले, मुग्धा गाडगीळ, हरिष खंडेलवाल, स्नेहल मोरे, आर. सीता लक्ष्मण आणि म्हैसूर येथील केंद्रिय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील संशोधक कनिका त्रिवेदी , रमेश मनचला, निर्मल कुमार यांनी एकत्रित रीत्या हे संशोधन केले आहे.
-------------------
सध्या रेशीम धाग्यांना रंगविण्याची पद्धती अशी आहे...
- धागे ब्लिच करणे, धुणे आणि पिळणे या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते.
- रंगविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगामध्ये एझो डाईजचा वापर होतो. हे रंग विषारी असतात.  त्यामुळे रंगविण्याच्या उद्योगामध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण प्रचंड असते. पर्यायाने परिसरातील जल स्रोतांच्या प्रदुषणामध्ये वाढ होते. ते पिण्यायोग्य राहत नाही.
- काही ठिकाणी या सांडपाण्यावर प्रक्रिया करून विषारी धातूंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, ते पुर्णांशाने शक्य होत नाही.
--------------------------

अशी आहे नवी पद्धती
- संशोधकांनी रेशीम किड्यांना रंग दिलेली पाने खाऊ घातली. त्यामुळे रेशीम किड्यांच्या शरीरात रंगांनी शिरकाव केला. त्यापासून कोष तयार होताना कोष पांढऱ्या रंगाऐवजी पानांच्या रंगाचे झाले.
- या आधी सिंगापूर व म्हैसूर येथे एकाच रंगाचे प्रयोग रेशीम किड्यावर करण्यात आले होते. हा रंग वस्त्रोद्योगामध्ये मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी महागडा ठरतो.
- त्यानंतर एनसीएल आणि म्हैसूर येथील संशोधकांनी प्रथमच कमी खर्चाच्या (ऍझो डाईज) आणि अर्ध्यापेक्षा अधिक वस्त्रोद्योगामध्ये सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या रंगावर प्रयोग केले आहेत.
---
असे झाले प्रयोग ः
- तुतीच्या पानांवर रंग फवारून किंवा रंगामध्ये बुडवून त्यांचा वापर रेशीम अळ्यांच्या (Bombyx mori) खाद्यासाठी करण्यात आला.
- चमकदार पिवळा, गडद लाल, पिवळसर भगव्या रंगाचे दोन प्रकार, काळा, लाल, सुडान या सारख्या सात रंगाचे प्रयोग केले. त्यांना डी1 ते डी 7 अशी नावे दिली.

सुधारीत खाद्य बनविण्याची पद्धती ः
- रेशीम किड्यांच्या अळीला पाचव्या अवस्थेमध्ये ताज्या तुतीची पाने देण्यात आली.  चौथ्या आणि पाचव्या दिवशी अळीला सुधारीत खाद्य देण्यात आले. सुधारीत खाद्य तयार करण्यासाठी पाने रंग विरघळलेल्या पाण्यामध्ये बुडवली किंवा त्याची फवारणी केली. रंगाच्या द्रावणाचे चित्र एस1 मध्ये दाखवलेले आहे. ही ओली पाने हवेमध्ये वाळवून रेशीम किड्याना खाऊ घातली. काही रेशीम किड्यांना व्यावसायिक रीतीने उपलब्ध तुती भुकटीचा खाद्य म्हणून वापर केला. या भुकटीमध्ये द्रावणाच्या प्रमाणात रंग मिसळण्यात आले. या दोन्ही पद्धतीचे कोषांच्या रंगाच्या परिणामाचे निष्कर्ष समान आले.
- या सुधारीत रंगाच्या खाद्यामुळे रेशीम किड्यांच्या वाढीमध्ये कोणताही फरक दिसून आला नाही.


- वरील सातपैकी डी 4, डी 5, डी 6 हे तीन रंग (डाय) अळ्यांच्या शरीरामध्ये जमा होत असल्याचे दिसून आले आहेत. त्यामागील कारणांचा अभ्यास केला गेला. पाण्यामध्ये विरघळणाऱ्या व पाण्याला दूर ठेवण्याच्या गुणधर्मांचा योग्य समन्वय असलेल्या रंगाचा या पद्धतीमध्ये वापर करणे शक्य असल्याचे दिसून आले.
------------------
आलेख ः कोष, सेरिसीन आणि फिब्रॉइन या तीनही घटकातील रंगाचे प्रमाण
- रंगाचे प्रमाण ( मायक्रोग्रॅम) भागिले कोष (मिलिग्रॅम)
- रासायनिक गुणधर्म आणि पाण्यात विरघळण्याची क्षमता (पार्टिशन कोइफिशंट)
- आलेखात काळ्या रंगामध्ये कोष, हिरव्या रंगामध्ये फिब्रोसीन आणि लाल रंगामध्ये सेरीसीन दिसत आहेत
- कोषातील रेशीम धाग्यात सिब्रॉइन आणि फिब्रॉइन हे दोन घटक असतात. सिब्रॉइनपासून बाह्य संरक्षण कवच तयार होते, तर फिब्रॉइन हे मुख्यतः प्रथिनांच्या स्वरुपात असते.
------------------
छायाचित्र 1 ः
अ. (Bombyx mori) या रेशीम अळ्यांची वाढ डी5 या रंगाने फवारलेल्या तुतीच्या पानावर केली.
ब. चंद्रिकेवर कोष निर्मितीसाठी कार्यरत अळ्या.
क. रंगीत कोष
ड. रंगीत कोषापासून मिळवलेल्या रेशीम धागे.
-------------------
छायाचित्र 2ः
 रेशीम किड्यांच्या शरीरातील रंगाचे प्रमाण मोजण्यासाठी त्यांचे शरीर विच्छेदन केले असता खालील बाबी दिसून आल्या.

ए. साधी तुतीची पाने खाऊ घातलेल्या रेशीम किड्याचा अंतर्भाग हा पांढरा किंवा रंगहिन होता. तसेच डी1 ते डी3 या रंगाच्या पानांचा खाद्यात समावेश असलेल्या रेशीम किड्यांचा अंतर्भागही रंगहिन किंवा पांढरा राहिला.
बी. ते डी. ः डी4 ते डी6 रंगाचे खाद्य दिलेल्या रेशीम किड्याचा अंतर्भाग.
- डी5 ( मॉर्डंट ब्लॅक) रंगाचा परिणाम हा डी4 ( ऍसीड ऑरेंड2) आणि डी6 ( डायरेक्ट ऍसीड फास्ट रेड) या दोन रंगापेक्षा कमी असल्याचे दिसून आले.
- कोणते रंग रेशीम किड्यामध्ये ग्राह्य होऊन, त्याचे रुपांतर कोषामध्ये होते, या विषयी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता यामुळे निर्माण झाली आहे.
---------------------
निष्कर्ष ः
- या पद्धतीने रंगीत कोष निर्मितीसाठी डाय किंवा रंगांमध्ये पाण्यात विरघळण्याचे (हायड्रोफिलॅसिटी) आणि पाण्याला दूर ठेवण्याच्या गुणधर्मांचा (हायड्रोफोबिसिटी ) योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. पाण्यात अधिक विरघळणाऱ्या (डी1 ते डी3 ) किंवा पाण्याला अधिक दूर ठेवणाऱ्या रंगाचा (डी5 व डी7) वापर केल्यानंतर   कोषामध्ये रंग उतरले नाहीत.
- योग्य समन्वय असलेल्या डी4 आणि डी6 या रंगाच्या वापराने मात्र चांगले निष्कर्ष मिळाले.
- रंगाचे व कोषातील प्रथिनांमध्ये त्यांच्या शोषले जाण्याचे रासायनिक विश्लेषण केले गेले. त्यातून लिपोफिलिसिटी (म्हणजेच रंग पाण्यात विरघळतोही, व पुर्ण प्रमाणात विरघळतही नाही, अशी अवस्था) हा रंगाचा गुणधर्म कोषातील दोन प्रथिनांसह रंग उतरण्याच्या क्रियेतील महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे दिसून आले.
- या संशोधनासाठी पुणे येथील सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि म्हैसूर येथील मध्यवर्ती रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांनी आर्थिक साह्य दिले होते.
--------
या संशोधनाचे काय फायदे होतील
वस्त्रोद्योगामध्ये धाग्यांना रंग देण्याच्या क्रियेमध्ये अनेक विषारी धातूंनी युक्त अशा रंगाचा समावेश असतो. या नव्या पद्धतीमध्ये नैसर्गिकरीत्या रंगांचा अंतर्भाव कोषात, धाग्यात होत असल्याने पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य होणार आहे. जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी ही नवी पद्धत पर्यावरणपूरक ठरू शकते.
-----------------
http://pubs.acs.org/doi/pdf/10.1021/sc400355k

उत्पादन वाढीसाठी ताणांच्या स्थितीतही नैसर्गिक यंत्रणा होते कार्यरत

उत्पादन वाढीसाठी ताणांच्या स्थितीतही नैसर्गिक यंत्रणा होते कार्यरत

ताणाच्या स्थितीतही पिकांचे उत्पादन वाढविणाऱ्या वनस्पतीतील एका नैसर्गिक यंत्रणेचा शोध अमेरिकेतील डुरहॅम विद्यापीठातील संशोधकांना लागला आहे. त्यामुळे ताणांच्या स्थितीत वाढ खुंटून पिकांच्या उत्पादनामध्ये होणारी घट रोखणे शक्य होणार असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. हे संशोधन जर्नल डेव्हलपमेंटल सेल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच या तंत्राच्या स्वामीत्व हक्क (पेटंट) साठी अर्ज करण्यात आला आहे.

हवामान बदलाच्या काळात वनस्पतींना विविध ताणांना सामोरे जावे लागते. या कालावधीमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये घट येते. काही वेळा पिकांची वाढ खुंटते. अवर्षण, मातीतील क्षारांचे अधिक प्रमाण अशा ताणाखाली वनस्पती अनेक कार्ययंत्रणांचा वेग कमी करून किंवा थांबवून तग धरण्याच्या दृष्टीने ऊर्जेची बचत करतात. त्यासाठी वनस्पतींच्या वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या संजीवकांच्या (जिबरेलिन) निर्मितीवर नियंत्रण आणले जाते. त्यामुळे पिकांची वाढ कमी होऊन उत्पादनामध्ये घट येते. या समस्येवर मात करण्यासाठी डुरहॅम पीक सुधारणा तंत्रज्ञान संस्थेच्या नेतृत्वाखाली नॉटिंगहॅम विद्यापीठ, रोथॅमस्टेड संशोधन आणि वारविक विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये वनस्पतीमध्ये वाढीचे जिबरेलिन या संप्रेरकाशिवाय नियंत्रण करण्याची नैसर्गिक क्षमता असल्याचे दिसून आले आहे.  विशेष म्हणजे ही क्षमता पर्यावरणातील ताणांच्या कालावधीमध्येही कार्यरत असते. या प्रक्रियेसाठी वनस्पती एक सुधारीत प्रथिन ( त्याला संशोधकांनी सुमो SUMO हे नाव दिले आहे.) तयार करते. हे प्रथिन वाढीवर नियंत्रण आणणाऱ्या प्रथिनांशी समन्वय साधून वाढीतील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्याचा फायदा ताणांच्या स्थितीमध्येही अधिक उत्पादन मिळविण्यासाठी होऊ शकतो.

पिकामध्येही असते अशीच यंत्रणा
हे प्रयोग संशोधकांनी थेल क्रेस या प्रारुप वनस्पतीवर केले आहेत. ही वनस्पती युरोप आणि मध्य आशियामध्ये नैसर्गिकरीत्या आढळते. मात्र, अशाच प्रकारची यंत्रणा सध्याच्या पिकातील बार्ली,मका, भात आणि गहू पिकामध्येही असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे.
-------------------

ताणाच्या स्थिती तयार होत असताना वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण आणणाऱ्या विशिष्ट प्रथिनांची पातळी स्थिर ठेवणारी वनस्पतीतील रेण्वीय यंत्रणा प्रयोगात आढळली आहे. ही यंत्रणा जिबरेलिन संप्रेरकासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेपेक्षा वेगळी आणि स्वतंत्रपणे कार्यरत असते. या यंत्रणेचा वापर ताणाच्या स्थितीतही वनस्पतीच्या वाढीसाठी होऊ शकतो. हे शेतकऱ्यांसाठी उत्पादनवाढीच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.  
- डॉ. अरी सदानंदोम, सहयोगी संचालक, डुरहॅम पीक सुधारणा तंत्र संस्था, डुरहॅम विद्यापीठ. 

जर्नल संदर्भ ः
Lucio Conti, Stuart Nelis, Cunjin Zhang, Ailidh Woodcock, Ranjan Swarup, Massimo Galbiati, Chiara Tonelli, Richard Napier, Peter Hedden, Malcolm Bennett et al. Small Ubiquitin-like Modifier Protein SUMO Enables Plants to Control Growth Independently of the Phytohormone Gibberellin. Developmental Cell, January 2014 DOI: 10.1016/j.devcel.2013.12.004

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

मृत झांडापासून जैवइंधन निर्मितीसाठी संशोधन होतेय सुरू

मृत झांडापासून जैवइंधन निर्मितीसाठी

 संशोधन होतेय सुरू


अमेरिकी कृषी विभागाच्या वतीने दिले 

10 दशलक्ष डॉलरचे आर्थिक साह्य


रॉकीज पर्वताच्या परिसरामध्ये किटकांच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या झाडांचे प्रमाण मोठे आहे. या झांडापासून जैव ऊर्जा इंधन निर्मिती करण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यासाठी अमेरिकी कृषी विभागाने कोलोरॅडो राज्य विद्यापीठ आणि सहकारी, प्रशासकीय, औद्योगिक आणि शासकीय पातळीवरील संस्थांना संशोधन साह्य म्हणून 10 दशलक्ष डॉलरचे अनुदान जाहिर केले आहे.


रॉकिज पर्वताच्या परिसरातील सुमारे 42 दशलक्ष एकर अमेरिकी जंगलांवर पाइन आणि स्पुरस बार्क भुंगेरे यांचा प्रादुर्भाव झाला आहे. 1996 पासून झाडे मृत होण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा प्रादुर्भाव पसरत जाण्याचा धोका आहे. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. त्यासोबत मृत झालेल्या झाडांपासून उपलब्ध बायोमासचा उपयोग स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे.

अमेरिकेतील कृषी सचिव चॉम विल्सॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुंगेऱ्यामुळे मृत झालेल्या झाडांपासून इंधन निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत. या इंधन निर्मितीसाठी उपलब्ध मृत झाडांचा वापर केला जाणार असल्याने नव्या लागवडीचा प्रश्न नाही. तसेच वातावरणावर परिणाम होण्याचीही भिती नाही. अर्थात, या संशोधनामध्येही काही अडचणी आहेत. ही जंगले अत्यंत दुर्गम भागामध्ये पसरलेली आहेत. त्यामुळे काढणी आणि वाहतूकीच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे. तसेच तांत्रिक अडथळे, पर्यावरणावर होणारे परिणाम, सामाजिक प्रश्न आणि स्थानिक धोरणे यांचेही प्रश्न सोडवावे लागणार आहेत. संशोधनासाठी आर्थिक साह्य राष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेच्या (NIFA) वतीने देण्यात आले आहे.


अमेरिकेतील चार राज्यांचा प्रकल्पात सहभाग


  • कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधन आणि अन्य विद्यापीठे, शासकीय, कासगी उद्योगातील संशोधकांच्या साह्याने जैवऊर्जा गट तयार करण्यात येणार आहे. जैवइंधन निर्मितीतील अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
  • या प्रकल्पाद्वारे आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक, धोरणात्मक बाबींचा समग्र अभ्यास केला जाणार आहे. 
  • या प्रकल्पामध्ये मोंटाना, वायोमिंग, इदाहो या राज्यातील विद्यापीठांचा समावेश असून अमेरिकी वन सेवा रॉकी पर्वतीय संशोधन केंद्र, राष्ट्रीय अपारंपरिक ऊर्जा प्रयोगशाळा आणि शीत ग्रह ऊर्जा प्रणाली या संस्थांचा सहभाग आहे.  


ताणाच्या स्थितीत होतो दीर्घकालीन स्मृतींवर परिणाम


गोगलगायींवरील प्रयोगातील निष्कर्ष

लॅमनिया स्टॅग्नालिस या प्रजातीच्या गोगलगायींवर प्रयोग करण्यात आले.
(स्रोत ः साराह डेल्समन)


ताण वाढल्यानंतर मेंदूतील प्रक्रिया रोखल्या जात असल्याचे तलावातील गोगलगायींवर एक्सटर विद्यापीठ आणि कॅलगरी विद्यापीठामध्ये झालेल्या प्रयोगामध्ये दिसून आले आहे. संशोधकांनी केलेल्या प्रयोगामध्ये प्रशिक्षीत गोगलगायींमध्ये अधिक ताण असलेल्या परिस्थितीत दीर्घकालीन स्मृतींवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

एक्सटर विद्यापीठातील संशोधिका डॉ. साराह डेल्समन यांनी सांगितले, की प्रत्यक्ष जीवनामध्ये ताणांच्या परिस्थीतीमध्ये प्रत्येक सजीव कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या आधी माणसांवर ताणपूर्ण परिस्थितींच्या परिणामांमध्ये असेच निष्कर्ष मिळाले होते.  असेच प्रयोग प्रशिक्षित गोगलगायींवर करण्यात आले असून, त्यांच्या वर्तवणूकीचा आणि मेंदूमध्ये होत असलेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे. एखाद्या ताणामुळे स्मरण शक्तीमध्ये काहीसा फरक पडत असला तरी एकापेक्षा अधिक ताणपूर्ण प्रसंगामध्ये स्मरणशक्तीवर मोठा विपरीत परिणाम होतो. विशेषतः स्मरणांची प्रक्रिया रोखली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

गोगलगायींवर प्रयोग का केला जातो

हे प्रयोग तलावातील लॅमनिया स्टॅग्नालिस (Lymnaea stagnalis) या प्रजातीच्या गोगलगायींवर करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील चेतापेशी मोठ्या असून स्मरणाशी संबंधित प्रक्रियांच्या अभ्यास करणे सोपे असते. या गोगलगायी ताणांच्या परिस्थितीला सस्तन प्राण्यासारखेच प्रतिसाद देतात. त्यामुळे शिकणे आणि स्मरणाशी संबंधित प्रयोगात प्रारूप म्हणून त्यांची निवड केली जाते.

असा झाला प्रयोग


  • गोगलगायी पाण्यामध्ये त्वचेच्या साह्याने श्वसन करतात. पाण्यामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी असते. जमिनीवर श्वसन करताना त्वचेवर असलेल्या छिद्राचा वापर करून हवा आत घेतात. 
  • गोगलगायींना जेव्हा ऑक्सीजनचे प्रमाण कमी असताना त्यांची हवा आत घेण्यासाठीची छिद्रे प्रत्येक वेळी बंद केली जातात. त्यातून त्यांना त्वचेद्वारे श्वसन करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यातून त्यांची स्मरणशक्ती तयार होते. 
  • त्यांच्या स्मरणशक्तींच्या चाचण्या घेतल्या. त्या चाचणीमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्या गोगलगायींना अचानक ताणांच्या स्थितीमध्ये सोडले जाते. विशेषतः कमी कॅल्शियम असलेल्या ठिकाणी त्यांच्यावर ताण येतो. कारण कवच निर्मितीसाठी त्यांना कॅल्शिअमची गरज असते. तसेच एका जागी अधिक गोगलगायींची गर्दी झाल्यास त्यांच्यावर ताण येतो. 
  • ताणाच्या परिस्थितीमध्ये दीर्घ स्मरणशक्ती तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. मात्र, एक मिनीट ते तासांच्या कालावधीतील लघू स्मरणशक्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. 
  • मात्र, दोन्ही ताण परिस्थिती एकाच वेळी आल्यास त्यांच्या स्मरणशक्ती तयार होणे, शिकण्याची प्रक्रिया रोखले जात असल्याचे दिसून आले. 


जर्नल संदर्भ ः
Sarah Dalesman, Hiroshi Sunada, Morgan Lee Teskey, Ken Lukowiak. Combining Stressors That Individually Impede Long-Term Memory Blocks All Memory Processes. PLoS ONE, 2013; 8 (11): e79561 DOI: 10.1371/journal.pone.0079561

-------------------------


डाळिंब रोखते मेदयुक्त खाद्याचे विपरीत परिणाम


अतिरीक्त मेद असलेल्या पदार्थांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. या विपरीत परिणामांना रोखण्याची क्षमता डाळिंबामध्ये असल्याचे स्पॅनिश संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

स्पेन येतील कॅटालन ह्रद्यशास्त्र संस्थेमध्ये झालेल्या प्रयोगामध्ये  फळापासून बनविलेल्या पूरक खाद्यपदार्थामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. या पूरक खाद्यपदार्थांच्या चाचण्या माणसांसारखेच ह्रद्य असलेल्या वराहावर घेण्यात आल्या. या चाचण्या घेण्यापूर्वी त्यांनी अतिरीक्त मेद असलेला आहार देण्यात आला होता. या पूरक खाद्यामध्ये 200 मिलीग्रॅम पॉलीफिनॉल घटक ( त्यालाच प्युनिकलॅजिन्स असे म्हटले जाते.) ठेवण्यात आला. त्यामुळे मेदयुक्त खाद्यामुळे होणारे रक्तवाहिन्या कडक करण्याचे प्रमाण कमी होते. ह्रद्यरोग आणि अर्धांगवायूसारख्या रोगांना दूर ठेवणे शक्य होते. या संशोधनाबाबत माहिती देताना डॉ. लिना बॅडिमोन यांनी सांगितले, की आहारामध्ये डाळिंबाचा समावेश असल्यास त्यातील पॉलिफिनोलिट घटक ह्रद्य आणि शरीरातील अकार्यक्षमता निर्माण करणाऱ्या विविध घटकांचे परिणाम रोखू शकत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

हरितगृहाचे ऊर्जा कार्यक्षम प्रारूप विकसनासाठी शोधले नवे गणिती साधन


चिली देशातील संशोधन


चिली येथील संशोधकांनी हरितगृहातील वातावरणांचे नियंत्रण करण्यासाठी नवे गणिती साधन विकसित केले आहे. या साधनामुळे हरितगृहातील तापमान, सूर्यकिरणांचे बदलते प्रमाण यांच्या सोबत गणिती पद्धतीने नियंत्रण करणे शक्य होणार आहे.

आपल्याकडे पुर्णपणे नियंत्रित स्वरुपांची हरितगृहे कमी प्रमाणात आहे. पुर्णपणे नियंत्रित पद्धतीच्या हरितगृहामध्ये वातवरणांच्या नियंत्रणावरच उत्पादनाचे गणित विसंबलेले असते. वातावरणातील बदलते घटक सातत्याने मोजत त्याचे विविध पद्धतीद्वारे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी एक नवे साधन चिली येथील सॅण्टा मारिया तंत्रविद्यापीठातील ऊर्जा नवोन्मेषी संस्थेचे संचालक जैमी इस्पीनोझा आणि स्थापत्य आणि यांत्रिकी अभियांत्रिकीचे विद्यार्थी मॅक्सीमिलिनो रॅमीरेझ यांनी तयार केले आहे. त्याबाबत माहिती देताना इस्पीनोझा म्हणाले, की कृषी क्षेत्रामध्ये लागवड, उत्पादन, पॅकिंग आणि रेफ्रिजरेशन यासारख्या प्रत्येक विभागामध्ये नवेनवे तंत्रज्ञान सातत्याने उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीतील हरितगृहामध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या कोणत्या पद्धतीने कामकाज चालते आणि त्यामध्ये कोणत्या शास्त्रीय सुधारणा होऊ शकतात,  यावर काम सुरू केले होते. ऊर्जा नवोन्मेषी संस्थेच्या वतीने ऊर्जेच्या कार्यक्षम वापराच्या दृष्टीने विविध प्रकारचे हरितगृह प्रारूप तयार करण्यात आली आहेत. या आधी झालेल्या अभ्यास आणि संशोधनातून गणितीय साधनांच्या साह्याने नवे प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. हे साधन सातत्याने बदलत राहणाऱ्या सौर किरणे, तापमान या सारख्या घटकांचे मापन करतानाच नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते पर्याय उपलब्ध करते.


सर्व शास्त्रांचा समन्वय शेतीसाठी आवश्यक 

हरितगृह हे केवळ कृषी क्षेत्राशी संबंधित नसून त्यात यांत्रिकी, भौतिक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र यांचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शास्त्रीय प्रारूप तयार करताना या बाबी महत्त्वाच्या होत्या.

  • हरितगृहातील तापमानाचे मापन करताना दिवसातील तापमान एक मुख्य मुद्दा असतोच, त्यासोबत वर्षातील प्रत्येक दिवसांचे तापमान यांचाही अंदाज असणे आवश्यक असते. तोही दृष्टीकोन समोर ठेवावा लागतो. 
  • वातावरणातील सापेक्ष आर्द्रता आणि येणाऱ्या धुक्यांचा अंदाज मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी विविध माहिती मिळवणे आणि त्यांचे विश्लेषण करत हरितगृह आणि प्रदेशातील वातावरणातील बदलत्या घटकांची सांगड घालण्याची आवश्यकता असते.



विविध वातावरणामध्ये होणार अधिक प्रयोग 


  1. प्रयोगासाठी निवडण्यात आलेले हरितगृह पॉलीइथीलीन आच्छादनाचे व चॅपेल पद्धतीचे होते. विश्लेषणातून हरितगृहाच्या आतील वर्षभराचे तापमान मिळवण्यात आले. त्यातून पिकांना उपलब्ध केलेल्या वातावरणाची संपुर्ण प्रतिमा उभी राहण्यास मदत होते.
  2. भविष्यामध्ये वेगळ्या प्रदेशातील वेगळ्या वातावरण परिस्थितीमध्ये अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार या प्रारूपामध्ये बदल करण्यात येतील. त्यातून अधिक ऊर्जा कार्यक्षम हरितगृहे तायर करणे शक्य होणार आहे.